
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई– बुधवारी रात्री मुंबईत बरसलेल्या पूर्वमोसमी पावसानंतर गुरुवारी दिवसभर आकाश काळवंडलेले असतानाही पावसाने गायब राहून नागरिकांची चकवा-चकवी केली. मात्र, हवामान खात्याने शुक्रवारी मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आज वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा कोकण पट्ट्यात पावसाचा जोर अधिक राहील, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
बुधवारी रात्री उशिरा मुंबई शहरात आणि उपनगरांत पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. पण गुरुवारी दिवसभर पावसाचे ढग असूनही पाऊस पडला नाही. त्यामुळे शहरात उकाडा जाणवला आणि नागरिक गोंधळात सापडले.
हवामान खात्याच्या प्रमुखानी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासून अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होणार असून, यामुळे उत्तर कोकण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता असून, ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात उतरणाऱ्या मच्छीमारांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.