
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील मॉडेल स्कूल व मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात आज प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफीसह बच्चू कडूंना न्याय द्यावा, अशा मागण्यांसाठी गोंधळ घातला. या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि कार्यक्रम स्थळी ठिय्या आंदोलन केले.
कार्यक्रम सुरू असताना प्रहार संघटनेचे कार्यकर्ते अचानक उठले आणि “शेतकऱ्यांची कर्जमाफी करा”, “बच्चू कडूंना न्याय द्या” अशा घोषणा देऊ लागले. महिलांचाही मोठा सहभाग दिसून आला. बच्चू कडू उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, तरीही सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.
यावेळी अजित पवारांनी हस्तक्षेप करत आंदोलकांशी संवाद साधला. “आम्हालाही शेतकऱ्यांची काळजी आहे. चर्चा करून निर्णय घेतला जाईल. बच्चू कडू यांच्या मागण्या विचारात घेण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं जाईल. कालच बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली आहे,” असे आश्वासन दिले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या गोंधळामुळे कार्यक्रम काही काळासाठी ठप्प झाला.
दरम्यान, बच्चू कडू यांचे उपोषण आज सहाव्या दिवशी पोहोचले आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी काँग्रेस व शरद पवार गटानेही पाठिंबा जाहीर केला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.