“ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांचा व्हिडीओ गेमसारखं” – नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य

0
75

माणदेश एक्सप्रेस न्यूज|नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईचं संपूर्ण देशभरात जोरदार कौतुक होत असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांनी या मोहिमेवर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

 

पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरविषयी बोलताना म्हटलं, “लष्कराची ही कारवाई लहान मुलं जशी कॉम्प्युटरवर व्हिडीओ गेम खेळतात, तशीच होती.” त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली असून, सोशल मीडियावरही याला तीव्र विरोध होत आहे.

 

 

पटोले पुढे म्हणाले, “भारताने ऑपरेशनपूर्वीच पाकिस्तानला याची माहिती दिली होती. त्यामुळे पाकिस्तानने आपले माणसं तिथून काढून घेतली. शिवाय, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारावरून दबाव आणल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली.” त्यांच्या या दाव्यामुळे केंद्र सरकारवरही अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे.

 

पटोलेंच्या वक्तव्यावर भाजपने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रवक्त्यांनी म्हटलं, “भारतीय लष्कराच्या पराक्रमाची तुलना व्हिडीओ गेमशी करणं ही केवळ लाजीरवाणी गोष्ट आहे. अशा वक्तव्यांनी जवानांचे मनोबल खच्ची होतं. काँग्रेसने तात्काळ या वक्तव्यावर माफी मागावी.”

 

 

दरम्यान, काँग्रेसकडून या वक्तव्यावर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, नाना पटोलेंच्या विधानामुळे काँग्रेसला आगामी राजकीय रणनीतीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. लष्कराच्या कार्यवाहीविषयी वादग्रस्त वक्तव्य करणं आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण करणं योग्य की अयोग्य? यावर आता जनतेची नजर लागली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here