
माणदेश एक्स्प्रेस/नागपूर : खरोखरच बापरे म्हणण्याची वेळ चंद्रपूरवर आली आहे, कारण चंद्रपूर देशातच नव्हे, तर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले. सोमवारी शहराचा पारा ४५.६ अंशावर पोहचला. रविवारीही ते देशात पहिलेच होते. आता पुढील ५ दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात सूर्याच्या ज्वाळांची भट्टी पेटल्यासारखी स्थिती आहे, कारण जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत चार शहरे विदर्भातीलच आहेत. चंद्रपूरनंतर जगात तिसऱ्या क्रमांकावर जिल्ह्यातीलच ब्रम्हपुरी शहर असून, जेथे सोमवारचे तापमान ४५ अंश होते. अमरावती पाचव्या क्रमांकावर आहे. येथे सोमवारचा पारा ४४.६ अंशावर गेला आहे. यादीत ४४.१ अंशासह अकोला जिल्हा १२ व्या क्रमांकावर आहे.
जगभरातील सर्वात उष्ण १५ शहरांमध्ये ११ शहरे एकट्या भारतातील आहेत. विदर्भातील ४ शहरांसह यादीत दुसऱ्या क्रमांकावरील झारसुगुडा येथे ४५.४ अंश तापमान नोंदविण्यात आले. सहाव्या क्रमांकावर सिधी (४४.६), सातवे राजनांदगाव (४४.५), ९ व्या क्रमांकावर प्रयागराज व घूपुर (४४.३), ११ वे खजुराहो (४४.२), १४ वे आदिलाबाद (४३.८) आणि १५ व्या क्रमांकावर रायपूर (४३.७) यांचा समावेश आहे.