
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|पुणे – नैऋत्य मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, राज्यभर अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर तुलनेने कमी असला तरी पुढील पाच दिवस या भागांतही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील विविध भागांतील परिस्थिती –
नाशिक : सततच्या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. काही धरणांतून विसर्ग सुरू असून गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुतोंड्याच्या परिसरात कमरेपर्यंत पाणी साचले आहे.
अहिल्यानगर : घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे मुळा धरणात २१,५०० क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.
सोलापूर : उजनी धरणाचा पाणीसाठा ६० टक्क्यांवर पोहोचला असून दौंड भागातून २१ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
रत्नागिरी : खेडमधील जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळीवर पोहोचले आहे. तुळशी घाटात दरड कोसळल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
धुळे : धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यांत रात्रभर पाऊस पडला आहे.
नंदुरबार : वीज पडून २६ मेंढ्या व शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कोल्हापूर-सातारा-सांगली : कोकण व घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असून कोयना धरणाचा साठा वाढला आहे.
महाबळेश्वर-तापोळा मार्गावर दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पुढील अलर्ट
हवामान विभागाने पुढील पाच दिवस कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला आहे.
२० जून : ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, नाशिक, सातारा घाट परिसरात यलो अलर्ट
२०-२२ जून : पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट
पुढील काही दिवस कोकणात मुसळधार पावसाचा जोर कायम राहील.
राज्यात पावसामुळे पूरस्थिती, दरडी कोसळण्याचे प्रकार, वीज पडणे यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी व प्रशासनाने सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.