
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : झी मराठीवरील आगामी मालिका ‘कमळी’ केवळ कथानकामुळेच नव्हे, तर तिच्या सामाजिक उपक्रमांमुळेही चर्चेचा विषय ठरत आहे. अलीकडेच ‘कमळी’च्या टीमने ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट, गोखले रोड नौपाडा येथे 3000 हून अधिक विद्यार्थ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित भव्य शिवस्तुती सादर केली. या स्तुतीला वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया मध्ये मान्यता मिळाली असून, हा उपक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा अभिमान ठरला आहे.
कमळी म्हणजेच अभिनेत्री विजया बाबर, तसेच केतकी कुलकर्णी आणि निखिल दामले या कलाकारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत सादर झालेली शिवस्तुती प्रत्येकाच्या मनाला भिडणारी ठरली.
‘कमळी’ या मालिकेची कथा एका खेड्यातून येणाऱ्या जिद्दी मुलीभोवती फिरते, जिने शिक्षणाच्या जोरावर स्वतःचं आयुष्य घडवायचं ठरवलं आहे. केवळ स्वतःपुरतंच नव्हे, तर आपल्या गावातच महाविद्यालय सुरू करून इतर मुलींनाही शिकण्याची संधी मिळावी, हा तिचा निर्धार आहे. ही कथा आणि मालिकेचे प्रेरणादायी प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत.
याआधीही ‘कमळी’च्या टीमने कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील शाळेत जाऊन 100 मुलींना सायकलींचं वाटप केलं होतं. दररोज 8-10 किमी चालत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ही मदत फारच उपयुक्त ठरली. ग्रामीण भागातील शिक्षणप्रेमाला चालना देणारे हे उपक्रम प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत.