
माणदेश एक्सप्रेस न्यूज | जुन्नर :
मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून न्याय मिळावा यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला निर्णायक वळण लागले आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “छत्रपतींच्या विचारांवर चालणारे सरकार छत्रपतींच्या विचारांवर चालणाऱ्या मराठ्यांवर गोळ्या घालणार का?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारला इशारा दिला की, मराठा समाज आपल्या हक्कासाठी माघार घेणार नाही.
मुंबईच्या आझाद मैदानावरील बेमुदत उपोषणासाठी रवाना होण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी शिवनेरीच्या पायथ्याशी पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवाई देवीच्या मंदिरात दर्शन घेतले. देवीची आरती करून शिवजन्मस्थळी मस्तक टेकवत तेथील पवित्र माती कपाळी लावली. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या लढाईसाठी “आता आरपार” अशी गर्जना केली.
या वेळी मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, आंतरवलीचे सरपंच पांडुरंग तारख, हनुमान मुळीक, ज्ञानदेव काशिद, गंगाधर काळकुटे, बद्रीनाथ तारख, संजय गोडसे, जुन्नरमधील नेते सत्यशील शेरकर, ज्ञानेश्वर खंडागळे, मकरंद पाटे, सूरज वाजगे तसेच सकल मराठा समाजाचे गणेश महाबरे, संदेश बारवे, सुनिल ढोबळे, प्रवेश देवकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “एक मराठा लाख मराठा”, “आरक्षण मिळालेच पाहिजे” अशा घोषणांनी शिवनेरी मार्ग दणाणून गेला.
पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला जाहीर फटकारले.
“सत्ता दिली मराठ्यांनी, पण तुम्हीच मराठ्यांवर उलटलात.”
“गरीब मराठ्यांचा अपमान करू नका, त्यांची मने जिंका.”
“मी मॅनेज होत नाही म्हणून वारंवार माझ्या समाजाचा अपमान होतो, हे सरकारचे दुख आहे.”
त्यांनी स्पष्ट केले की आंदोलन कायदा आणि न्यायालयाने दिलेल्या चौकटीत सुरु आहे, कुठलाही कायदा मोडलेला नाही. परंतु जर सरकारने या आंदोलनाला हात घालण्याचा प्रयत्न केला तर “माझा समाज महाराष्ट्रभर आहे हे लक्षात ठेवा” असा इशारा त्यांनी दिला.
सरकारकडून गणेशोत्सवात अडथळा आणल्याचा आरोप होत असल्यावर जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले –
“अडथळा करायला आमच्या हातात बंदुका आहेत का? हिंदूंच्या सणात मुंबईला का चाललात म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, आंतरवलीत आंदोलन सुरु असताना गणपती बसले नव्हते का? तेव्हा लाठीचार्ज केला तेव्हा हिंदूंचा सण नव्हता का?”
त्यांनी स्पष्ट केले की “गोळ्या झेलायला आम्ही तयार आहोत, पण आरक्षणाच्या मागणीतून मागे हटणार नाही.”
जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा आव्हान दिले की, मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसी आरक्षणातूनच आरक्षणाचा विचार करावा.
“रायगड आणि शिवनेरी प्रेरणास्थळे आहेत. येथे आल्यानंतर इतिहास नेहमी यशाचा आहे. या लढाईत आम्हाला रोखणे अशक्य आहे. मराठा समाज आता कुठेही थांबणार नाही.”


