
माणदेश एक्सप्रेस न्युज | आटपाडी :
माणगंगा साखर कारखान्याच्या जमिनीच्या बोगस खरेदी दस्तांबाबत गंभीर आरोप करत या प्रकरणाचा भांडाफोड करण्याचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी फसवणूक करून कारखान्याच्या नावावर हस्तगत करण्यात आल्या असून, संबंधित सर्व खरेदीपत्रांची कागदपत्रे तात्काळ जमा करण्याचे आवाहनही त्यांनी पुजारवाडीतील ग्रामस्थांना केले.
पुजारवाडी (ता. आटपाडी) येथील मायाक्का मंदिरासमोर आयोजित सभामंडप भूमिपूजन कार्यक्रमात आमदार पडळकर बोलत होते. यावेळी विष्णुपंत अर्जुन, जयवंत सरगर, दादासाहेब हुबाले, अमोल काटकर, विनायक पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. पडळकर म्हणाले की, “शेतकऱ्यांची मेंढरे चरायला गेली असताना, त्याच काळात बोगस दस्तांच्या माध्यमातून कारखान्यासाठी जमिनी खरेदी करण्यात आल्या. हा कारखाना कोणत्याही व्यक्तीची खासगी मालमत्ता नसून शेतकऱ्यांच्या घामाच्या जोरावर उभा आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या जमिनी फसवून हस्तगत करूनच हा कारखाना उभा राहिला आहे. त्यामुळे जमिनीचा हक्क हिरावून घेणाऱ्यांना मी कधीही सोडणार नाही.”
याचबरोबर कारखान्याच्या जागेतून मोठ्या प्रमाणात मुरुमाची चोरी होत असल्याचाही गंभीर आरोप आमदार पडळकर यांनी केला. हजारो ब्रास मुरूम अवैधरित्या उपसा करून बाहेर विक्रीस नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दोषींवर कठोर कारवाई व्हावी तसेच ज्यांनी फसवणूक केली त्यांच्या उताऱ्यांवर तातडीने बोजा चढवावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी ग्रामस्थांनीही आपले प्रश्न मांडले. कारखान्याच्या नावावर झालेल्या या कथित फसवणुकीमुळे शेतकऱ्यांच्या भावनांना तडा गेला असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
आ. पडळकर यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “शेतकऱ्यांच्या जमिनींचा गळा घोटणाऱ्यांचा पाठपुरावा करून त्यांना तुरुंगापर्यंत घेऊन जाणार. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही.”


