रात्रीच्या अंधारात रक्ताचा सडा; मित्राचा खून करून शेतात लपला आरोपी

0
1

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | विटा :
खानापूर (ता. विटा) परिसरात सोमवारी उशिरा रात्री घडलेल्या खुनाच्या घटनेने परिसर हादरला आहे. मोबाईल परत घेतल्याच्या किरकोळ कारणावरून एकाने आपल्या मित्राचाच गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या खुनानंतर पसार झालेल्या संशयितास पोलिसांनी मंगळवारी सकाळी शेतातून नाट्यमयरित्या अटक केली. या घटनेमुळे खानापूर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीचे नाव जयंत विश्वास भगत (वय ४०, रा. खानापूर, ता. विटा) असे असून, आरोपीचे नाव जावेद मुबारक आत्तार (रा. खानापूर) असे आहे. आरोपी जावेद हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.


विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत आणि जावेद हे दोघे दीर्घकाळापासून मित्र होते. जयंत हा एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीत क्लिनर म्हणून काम करीत होता. काही दिवसांपूर्वी जयंतने आपला मोबाईल जावेदकडून परत घेतला होता, आणि याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या किरकोळ कारणावरूनच सोमवारी रात्री जावेदने जयंतला फोन करून खाली बोलावलं.

जयंत त्यावेळी मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये कामावर होता. मात्र, मित्राचा फोन आल्यावर तो लगेच खाली उतरला. त्याचवेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि संतापाच्या भरात जावेदने चाकू काढून जयंतच्या गळ्यावर वार केला. या अचानक हल्ल्यामुळे जयंत रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.


खून करून जावेद घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रात्रीभर शोध मोहीम राबवली. संशयिताचा ठावठिकाणा लागत नसल्याने परिसरात नाकाबंदी करण्यात आली. अखेरीस पोलिसांनी मंगळवारी सकाळी एका शेतात लपलेल्या जावेद आत्तार याला पकडले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार म्हणजेच चाकूही जप्त करण्यात आला आहे.


जावेद आत्तार हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यावर्षी २५ ऑगस्ट रोजी त्याने स्वतःच्या मेहुण्यावर चाकूने वार करून हल्ला केला होता. त्या प्रकरणी त्याला अटक झाली होती. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याने खुनासारखा गंभीर गुन्हा केल्याने स्थानिकांत संताप व्यक्त होत आहे.


या घटनेनंतर खानापूर गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मृत जयंत भगत हा शांत, साधा आणि मेहनती स्वभावाचा असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. केवळ मोबाईलच्या वादावरून त्याचा खून झाल्याने गावकऱ्यांमध्ये संताप आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here