
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि भारताच्या इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केंद्रीय शिक्षण मंडळ (CBSE) च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केली आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
या मागणीचे औचित्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या राज्याभिषेक दिनाचे निमित्त साधून करण्यात आले आहे. शिवसेनेच्या मते, छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट, शासनकौशल्य, युद्धनीती आणि धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन देशातील विद्यार्थ्यांना नेतृत्व, देशभक्ती आणि सामाजिक एकतेचे मूल्य शिकवू शकतो.
खासदार वायकर यांनी पत्रात नमूद केले आहे की,
“छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठा साम्राज्याचे संस्थापक नव्हते, तर ते एक कुशल प्रशासक आणि दूरदृष्टी असलेले राजकारणी होते. त्यांच्या इतिहासाचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांना भारताचा समृद्ध इतिहास आणि विविध संस्कृती यांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल.”
विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक प्रेरणा
सुमारे ३५० वर्षांपूर्वी, १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. त्या ऐतिहासिक घटनेला भारताच्या स्वाभिमानाचा एक सुवर्ण क्षण मानले जाते. त्यांच्या कार्यामुळे केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर संपूर्ण देशाचा गौरव वाढला. त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्थान राष्ट्रीय अभ्यासक्रमात असणे गरजेचे असल्याचे शिवसेनेचे मत आहे.
रायगडवर स्वच्छता मोहिमेद्वारे अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्ष, विद्यार्थी विकास विभाग आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या वतीने रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत ५८१ स्वयंसेवक, ३७ कार्यक्रम अधिकारी आणि अनेक शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले. गड परिसरातील प्लास्टिक आणि कचरा गोळा करून गड स्वच्छ करण्यात आला. ही मोहिम सलग दुसऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली असून शिवस्मारक उत्सव समिती किल्ले रायगड आणि सह्याद्री सेवक प्रतिष्ठान यांचे मोलाचे सहकार्य लाभले.