दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल – मनसे नेत्याचं मोठं विधान

0
30

माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मुंबई : “मराठी माणूस आपल्याकडे खूप आशेने पाहतोय. जर आम्ही असेच भांडत राहिलो तर मराठी माणूस आम्हाला क्षमा कसा करेल? एकाच मराठी आईची दोन मुले भांडू लागली तर काय अवस्था होईल?” अशा शब्दांत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असे आवाहन केले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र, या चर्चांना आता पुन्हा खंडित झाल्याचे दिसत आहे. यावरच प्रकाश महाजन यांनी मोठं विधान करत दोन्ही ठाकरे बंधूंनी राजकीय मतभेद विसरून मराठी समाजाच्या हितासाठी एकत्र यावे, असे स्पष्ट केले.

 

महाजन म्हणाले, “संजय राऊत यांनी वरिष्ठांसारखे वागले पाहिजे. आमच्या पक्षाकडून बाळा नांदगावकर दोन वेळा मातोश्रीवर गेले. आम्ही त्याला राज ठाकरेंनीच प्रत्यक्ष मातोश्रीवर गेले असा मान दिला. मग तुमच्याकडून असे प्रयत्न झाले आहेत का? तुम्ही कधी प्रस्ताव ठेवला आहे का?” असा सवाल त्यांनी शिवसेनेकडे करत खोचक टोला लगावला.

 

भाजपवर टीका करताना महाजन म्हणाले, “आज भाजपाने सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेतले. ज्यांचा फोटो दाऊदच्या माणसासोबत आहे. नाच करणाऱ्या माणसाला सत्तेसाठी पक्षात घेतात, जनता कोणाला मतदान करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

“इतिहासाने आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. जर मराठी माणसाचे रक्षण आज आपण केले नाही, तर मराठी माणूस शंभर वर्षे मागे ढकलला जाईल. हे दोन्ही भाऊ एकत्र आले नाहीत तर मराठी माणूस हताश होईल,” असा स्पष्ट इशारा महाजन यांनी दिला.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले, “राज ठाकरे यांची कोण भेटेल हे महत्त्वाचे नाही, पण त्यांनी मराठीचा मुद्दा लावून धरला आहे. मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान, त्यांनी त्यांचा मुद्दा ठामपणे मांडला आहे.”

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here