
माणदेश एक्सप्रेस न्युज|मुंबई : मुंबई, पुणे, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत मुंबई आणि लगतच्या भागांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असून, उद्या २७ मे रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे, मुंबईसह इतर प्रभावित जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी दूरध्वनीवरुन चर्चा केली. “संपूर्ण प्रशासन सज्ज ठेवावे, मदत व बचाव कार्य तातडीने हाती घ्यावे. पाण्याखाली गेलेले रस्ते, झपाट्याने वाहणारे नाले, विजेच्या तारा, धोकादायक इमारती यांकडे विशेष लक्ष द्यावे,” असे निर्देश शिंदे यांनी दिले.
उपनगरी रेल्वे आणि महत्त्वाच्या सेवांचा गतीमानपणा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना करताना त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्याचा आदेश दिला. नागरिकांना आवाहन करताना शिंदे म्हणाले, “सखल भागांतील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. अती आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये. प्रशासन सज्ज असून मदतीसाठी तत्पर आहे. मात्र, नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे.” हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढील २४ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.