
श्रोत्यांच्या प्रेमाने विजयी जोडीवर कौतुकाचा वर्षाव
माणदेश एक्सप्रेस न्युज|मुंबई – झी मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘चल भावा सिटीत’ चा महाअंतिम सोहळा रविवारी दिमाखात पार पडला. या पहिल्या पर्वाच्या अंतिम फेरीत पाच जोड्यांमध्ये रंगलेल्या चुरशीच्या लढतीत श्रुती राऊळ आणि ऋषिकेश चव्हाण या जोडीने बाजी मारत विजेतेपद पटकावले.
श्रेयस तळपदे यांच्या सुत्रसंचालनातील हा शो १५ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ग्रामीण आणि शहरी जीवनशैलीतील अदलाबदल, विविध टास्क आणि भावनिक क्षणांनी भरलेल्या या शोने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली.
महाअंतिम फेरीत अथर्व-रेवती, विजय-अनुश्री, दीपक-प्रणाली, रामा-नीता आणि ऋषिकेश-श्रुती या पाच जोड्यांमध्ये कडवी स्पर्धा झाली. त्यात ऋषिकेश व श्रुती यांनी आपल्या सादरीकरणाने निर्णायकांचा आणि प्रेक्षकांचा विश्वास जिंकत ट्रॉफीवर नाव कोरले.
विजयानंतर भावना व्यक्त करताना श्रुतीने सोशल मीडियावर लिहिले, “हा प्रवास माझ्यासाठी केवळ एक स्पर्धा नव्हता, तर माझं स्वप्न होतं. हा विजय माझ्या सर्व चाहत्यांचा आहे.”
ऋषिकेशनेदेखील पोस्ट करत म्हटले, “या ट्रॉफीचं श्रेय प्रेक्षकांच्या प्रेमाला आणि आशीर्वादांना जातं. हे यश सर्वांचं आहे.”
या शोमधून ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा अनोखा संगम प्रेक्षकांसमोर आला. सहभागींनी परस्पर जीवनशैली स्वीकारून नवे अनुभव घेतले. हा नवा प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि त्यातूनच हा शो यशस्वी ठरला.