
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई : देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला राज्यातील महायुती सरकारने ठाम पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी संसदीय समितीसमोर उपस्थित राहून ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेला पूर्ण समर्थन दिले.
फडणवीस आणि शिंदे यांनी यावेळी सांगितले की, निवडणुका एकाचवेळी घेतल्यास सरकारी खर्चात मोठी बचत होईल. सध्या वारंवार निवडणुका घेतल्या जातात, त्यामुळे वारंवार आचारसंहिता लागू होते आणि त्याचा थेट परिणाम विकासकामांवर होतो. निवडणुका एकत्रित झाल्यास शासनाला सलग पाच वर्षांसाठी ठोस निर्णय घेणे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य होते, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रश्न उपस्थित केला की, जर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच लोकसभा बरखास्त झाली, तर ‘एक देश, एक निवडणूक’ योजनेचे भवितव्य काय असेल?
एकीकडे महायुती सरकार या संकल्पनेचे स्वागत करत असताना, दुसरीकडे विरोधकांनी यावर शंका उपस्थित केल्यामुळे यासंदर्भातील चर्चा आता अधिकच रंगण्याची शक्यता आहे.