सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले; गरिबांवर अन्याय – राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

0
25

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई : राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या आर्थिक धोरणावर विरोधकांचा जोरदार हल्ला चढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या ५७,५०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली.

 

“राज्याचे आर्थिक संतुलन ढासळले असून त्यामुळे गरीब, वंचित आणि मागास समाजावर अन्याय होत आहे,” असा आरोप जयंत पाटील यांनी केला. चालू आर्थिक वर्षात आधीच ४५,८९१ कोटी रुपयांची महसुली तूट असताना, आता पुन्हा एवढ्या मोठ्या पुरवणी मागण्या मांडल्या जात आहेत. यामुळे एकूण आर्थिक तूट १ लाख ३ हजार कोटींपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

पाटील म्हणाले, “सरकारकडे बहुमत असल्यामुळे हे सर्व मंजूर होणार हे ठरलेलं आहे. पण खर्चाचा हिशोब नाही, योजनांचा लाभ प्रत्यक्षात गरीबांपर्यंत पोहोचत नाही. पुरवणी मागण्या फक्त कागदावर दाखवायच्या आणि प्रत्यक्षात निधी खर्च न करता वर्ष संपवायचं, हे सरकारचे नवे धोरण दिसते.”

 

ते पुढे म्हणाले, “याच वेगाने सरकार चालू राहिल्यास आगामी हिवाळी अधिवेशनात आणखी एक पुरवणी मागणी मांडली जाईल आणि एकूण तूट दीड ते दोन लाख कोटींपर्यंत जाईल. यामुळे सरकारकडे जेवढे कर्ज आहे, ते परतफेड न केल्यास अनेक लोक आर्थिक अडचणीत येतील.”

 

Sc, st, obc समाजासाठी आरक्षित निधीही केवळ कागदावर दाखवून, प्रत्यक्षात खर्च न करता वेळकाढूपणा केला जातो, असेही त्यांनी नमूद केले. “३१ मार्चला समजतं की त्या निधीतून एक रुपयाही खर्च झालेला नाही,” अशी टीका करत त्यांनी सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जयंत पाटलांच्या या टीकेमुळे अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राजकीय वातावरण तापले असून, आगामी दिवसांत विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here