
माणदेश एक्सप्रेस न्युज|सांगली : पूर आणि अतिवृष्टीमुळे होणाऱ्या जलसाच्यावर कायमचा उपाय म्हणून सांगली महापालिकेच्या ५९६ कोटी रुपयांच्या प्रकल्पास महसूल विभागाच्या प्रशासकीय मंजुरीने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या हद्दीतील विविध उपयोजनांचा समावेश असून, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
शासन निर्णयानुसार, जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमांतर्गत हा प्रकल्प मंजूर झाला आहे. प्रकल्पाअंतर्गत आधुनिक नकाशे तयार करून संभाव्य आपत्ती क्षेत्रांची ओळख पटवली जाईल आणि त्यावर आधारित उपाययोजना करण्यात येतील. तसेच, अतिवृष्टीच्या काळात साचणाऱ्या पाण्याचा जलद निचरा होईल, यासाठी गटारी, नाले आणि जलवाहिन्यांची मोठ्या प्रमाणावर सुधारणा केली जाणार आहे.
प्रमुख कामांमध्ये समावेश:
शामरावनगर परिसरातील साचलेले पाणी हरिपूर नाल्यात सोडणे, कोल्हापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भोबे गटाराचे बांधकाम, गंगोत्रीनगरमधील साचलेले पाणी अंकली नाल्यात सोडणे, शेरीनाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण व काँक्रिट नाल्याचे बांधकाम, मिरजमधील मालगाव रोड व वड्डीनाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण, नागरी वसाहतीजवळील नाल्यांचे काँक्रिटीकरण व नवीन गटारी बांधणे.
या कामांवर ५०१ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यावर १८ टक्के जीएसटी आणि प्रकल्प अंमलबजावणी सल्लागारासाठी ४.९२ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार आहे. एकूण प्रकल्प खर्च ५९६ कोटी रुपये इतका आहे.
हा प्रकल्प पूर्णत्वास गेला, तर शहरातील पावसाळी समस्या आणि पूर परिस्थितीवर निश्चितच नियंत्रण मिळविता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.