
माणदेश एक्सप्रेस न्यूज |मुंबई : एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला असून, लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० किमी पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना १५ टक्के सवलत मिळणार आहे. ही योजना येत्या १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे.
परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती दिली. ही सवलत फक्त पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना लागू असेल. विविध सवलती घेणाऱ्या प्रवाशांना (जसे की ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी इ.) ही सुविधा लागू राहणार नाही.
ही सवलत दिवाळी व उन्हाळी सुट्टीच्या गर्दीच्या कालावधीखेरीज वर्षभर मिळणार आहे. मात्र, गणपती उत्सव आणि आषाढी एकादशीसारख्या पर्वांसाठी प्रवाशांनी नियमित बससेवेचे आगाऊ आरक्षण केल्यास, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. तथापि, जादा बसेस या सवलतीच्या कक्षेत येणार नाहीत.
मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इ-शिवनेरी सारख्या एसटीच्या प्रीमियम सेवांमध्येही ही सवलत लागू होणार आहे. आगाऊ आरक्षण हे एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर (public.msrtcors.com), मोबाईल अॅप (MSRTC Bus Reservation) किंवा तिकीट खिडकीवर करता येणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवाशांचा खर्च कमी होणार असून, एसटीचा प्रवास आणखी सोयीस्कर आणि परवडणारा ठरणार आहे.