अखेर बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; सरकारकडून लेखी आश्वासन

0
301

माणदेश एक्स्प्रेस न्यूज|अमरावती : शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांसाठी निधी आदी १७ मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी गेल्या आठवड्यापासून सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलं. राज्य सरकारने तीन ठळक मागण्यांवर लेखी आश्वासन दिल्यानंतर कडूंनी आंदोलन थांबवण्याची घोषणा केली.

 

मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी ८ जूनपासून बच्चू कडू उपोषणास बसले होते. आंदोलनाचा सहावा दिवस उलटूनही सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत होता. विरोधी पक्षांसह अनेक सामाजिक संघटनाही त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या.

 

शुक्रवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: मोझरी येथे भेट देत बच्चू कडूंशी चर्चा केली. चर्चेनंतर महायुती सरकारच्या वतीने तीन महत्त्वाच्या मागण्यांवर लेखी आश्वासन देण्यात आले. यामध्ये:

 

o शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक १५ दिवसांत केली जाईल. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. तसेच थकीत कर्जदारांवरील सक्तीची वसुली थांबवण्याबाबत आणि नवीन कर्ज वाटपासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल.

o दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्यासाठी ३० जूनच्या पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल.

o इतर मागण्यांसाठी संबंधित मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल.

 

या लेखी आश्वासनानंतर बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन तसेच १५ जून रोजीचा नियोजित चक्का जाम आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.

 

“सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आमचं आंदोलन तात्पुरत स्थगित करत आहोत. सरकारने दिलेली आश्वासने पाळावीत, अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार,” असा इशाराही कडूंनी दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील अस्वस्थता काहीशी निवळली असली तरी सरकारची आगामी कृती महत्त्वाची ठरणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here