फडणवीस मंचावर असतानाही सरन्यायाधीश यांचे उद्धव ठाकरे यांच्यावर कौतुकाचे बोल!

0
60

माणदेश एक्सप्रेस न्यूज | नागपूर : राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेले दोन मोठे नेते – उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस – यांच्या संबंधांवर पुन्हा एकदा लक्ष वेधणारी घटना नागपूरमध्ये घडली. एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित असताना देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी फडणवीस मंचावर असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भरभरून कौतुक केले.

 

 

नागपूर येथे महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी आयोजित कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई, मुख्यमंत्री फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी न्या. गवई यांनी आपल्या भाषणात विधान केले की, “कोविड काळात देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यापीठाच्या निधीसाठी कुठलीही अडचण होऊ दिली नाही.” त्यांनी ही बाब खास उल्लेख करत सांगितली की, “उद्धव ठाकरे यांनी कठीण परिस्थितीतही शैक्षणिक संस्थांना साथ दिली.”

 

 

न्या. गवई यांनी या विद्यापीठाच्या विकासाचा प्रवास उलगडताना सांगितले की, २०१६ साली भूमिपूजन झाले तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाला भरपूर निधी मिळाला. त्यानंतर ते विरोधी पक्षनेते बनले आणि नंतर पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाले.

 

 

त्यांनी मिश्कीलपणे नमूद केले की, “फडणवीसांचे राजकीय स्थान दर वेळेस बदलते, पण विधी विद्यापीठाच्या कार्यक्रमात मात्र ते कायमच उपस्थित राहतात.” या भाष्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र या कार्यक्रमाचे विशेष लक्ष वेधून घेतले ते म्हणजे गवई यांनी केलेले ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक. मंचावर उपस्थित असलेल्या फडणवीसांसमोर केलेल्या या गौरवाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

 

राजकीय मतभेद आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांसारख्या सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तीने उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीचा जाहीर उल्लेख आणि प्रशंसा केल्यामुळे या घटनेला वेगळे राजकीय परिमाण मिळाले आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here