
आटपाडी | माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी येथे खाजगी मोजणीचे काम करणारे इंजि. राहुल ऐवळे (रा. नाझरे, ता. सांगोला) आणि त्यांचे सहकारी संदेश हेगडे रा. बनपुरी ता. आटपाडी यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवार, २१ जुलै रोजी साडेपाचच्या सुमारास हा भीषण अपघात सांगोला तालुक्यातील वाटंबरे गावाजवळ नागपूर-रत्नागिरी महामार्गावर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, इंजि. राहुल ऐवळे हे मूळ नाझरे (ता. सांगोला) येथील असून काही काळापासून आटपाडी येथे वास्तव्यास होते. ते आटपाडी तालुक्यात खाजगी जमिनी मोजणीचे काम करत होते. आज सायंकाळी ते आणि त्यांचा सहकारी संदेश हेगडे कामानिमित्त आटपाडीहून सांगोल्याला निघाले होते.
प्रवासादरम्यान वाटंबरे गावाजवळ नागपूर-रत्नागिरी महामार्गावर त्यांच्या चारचाकी वाहनाचा दुसऱ्या लेनमध्ये जाऊन एसटी बससोबत जोरदार अपघात झाला. धडक एवढी जबरदस्त होती की गाड्यांचे मोठे नुकसान झाले आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आटपाडीमध्ये आपल्या मनमिळावूपणासाठी परिचित असलेले इंजि. राहुल ऐवळे आणि सहकारी संदेश हेगडे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.