संभाजी महाराजांच्या नावाने लव्ह जिहादविरोधी कायदा करा – गोपीचंद पडळकर यांची मागणी

0
117

माणदेश एक्स्प्रेस न्यूज|अहिल्यानगर – राज्यातील ओबीसी आरक्षणावरून सतत चर्चेत असलेले भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आता लव्ह जिहाद आणि धर्मांतरासंदर्भात मोठी मागणी केली आहे. संभाजी महाराजांच्या नावाने लव्ह जिहादविरोधी कायदा आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने धर्मांतर बंदी कायदा करण्यात यावा, अशी स्पष्ट भूमिका पडळकर यांनी मांडली आहे.

 

अहिल्यानगर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण टिकवले असल्याचे सांगितले. “बाजीप्रभूप्रमाणे आम्ही सगळे प्रामाणिक आहोत. जे लढायचं ते समोरासमोर लढणारे आम्ही आहोत,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

 

 

धर्मांतर आणि लव्ह जिहाद याबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, “लवकरच राज्यात धर्मांतर बंदी आणि लव्ह जिहादविरोधी कायदा अस्तित्वात येणार आहे. धर्मांतर बंदी कायदा अहिल्यादेवींच्या नावाने, तर लव्ह जिहादविरोधी कायदा छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने करावा, ही माझी मागणी आहे.” त्यांनी पुढे इतिहासातील अन्यायाचीही आठवण करून दिली. “अहिल्यादेवी होळकर यांनी कोणत्याही एका जातीसाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी कार्य केले.

 

पण इतिहासकारांनी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकलेला नाही. मल्हारराव व यशवंतराव होळकर यांच्याही कार्याची दखल घेतली गेली नाही,” असा आरोप त्यांनी केला. अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यास सरकारने पुढाकार घेतल्याचे सांगत, “देवेंद्र फडणवीस यांनी एका झटक्यात चोंडीसाठी ७०० कोटींचा निधी जाहीर केला. त्यामुळेच आज अहिल्यादेवींना ३०० वर्षांनंतर न्याय मिळतोय,” असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

 

या भाषणाद्वारे पडळकरांनी ओबीसी आरक्षण, लव्ह जिहाद, धर्मांतर प्रतिबंध आणि इतिहास पुनर्लेखन यांसारख्या अनेक संवेदनशील मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घेतली असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here