
माणदेश एक्स्प्रेस न्यूज, मुंबई
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या नव्या पुस्तकामुळे चर्चेत आहेत. ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकातून त्यांनी अनेक राजकीय घडामोडींचे पडसाद उलगडले आहेत. त्यातच आता त्यांनी आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट करत सांगितले आहे की, ईडीकडून अटक होण्याच्या आदल्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना फोन करून “मी अमित शाहांशी बोलवू का?” असा प्रस्ताव दिला होता.
“अटकेच्या आधी एकनाथ शिंदेंचा मला फोन आला. ते म्हणाले की मी अमित शाहांशी बोलतो का? पण मी स्पष्ट सांगितलं – काही गरज नाही. मी पळणारा नाही, मी तुरुंगात जाण्यास तयार आहे. मी सक्षम आहे, मला वर कोणाशी बोलण्याची गरज नाही,” असे राऊत यांनी सांगितले.
यावेळी संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही गंभीर आरोप केले. “शिवसेना आणि भाजपात फूट पडायला सुरुवात झाली ती अमित शाह दिल्लीत आल्यावरच. त्यावेळी दिवंगत अरुण जेटली यांनीही शाह यांना समजावले होते की, ‘हे योग्य नाही.’ हे सर्व मला जेटलींनी स्वतः सांगितलं होतं,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकामध्ये राऊत यांनी आपला तुरुंगातील अनुभव आणि अनेक अनकथित गोष्टी उघड केल्या आहेत. आता या नव्या खुलास्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजपला आणखी अडचणीत आणणाऱ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे राजकीय खळबळ माजली असून, भाजप आणि शिंदे गटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र आगामी काळात यावर मोठी राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.