
माणदेश एक्प्रेस न्युज|पुणे : राज्यातील वैष्णवी हगवणे या तरुणीने कौटुंबिक छळामुळे आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर पुन्हा एकदा हुंडा प्रथा आणि महिलांवरील अत्याचारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘हुंडामुक्त महाराष्ट्र – हिंसामुक्त कुटुंब’ या अभियानाची घोषणा करत राज्यव्यापी लढ्याचा निर्धार केला आहे. या जनआंदोलनाला येत्या २२ जून २०२५ पासून पुण्यातून सुरुवात होणार आहे.
या मोहिमेमागील प्रेरणा सांगताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्राची लेक वैष्णवी कस्पटे-हगवणे हिचा हुंडाबळी ही केवळ एक घटना नाही, तर संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी वेदना आहे. आता केवळ शोक व्यक्त करून भागणार नाही, तर कृतीशील बदल घडवण्याची ही वेळ आहे.”
सुळे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे की, या अभियानात समाजातील सर्व घटकांचा आणि यंत्रणांचा सक्रीय सहभाग असावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. “हा लढा वैष्णवीसारख्या प्रत्येक लेकीसाठी आहे. तिच्या बलिदानाचे चीज झाले पाहिजे आणि त्यासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे,” असे त्या म्हणाल्या. तीन दशकांपूर्वी म्हणजेच २२ जून १९९४ रोजी शरद पवार यांच्या पुढाकाराने देशातील पहिले महिला धोरण जाहीर करण्यात आले होते, हेही त्यांनी अधोरेखित केले. “आज त्या इतिहासाला उजाळा देत पुन्हा एकदा आपण एक सामूहिक लढा उभारणार आहोत,” असे त्या म्हणाल्या.
हा लढा पुण्यातून सुरू होईल आणि संपूर्ण वर्षभर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात येईल. विविध टप्प्यांमध्ये कार्यशाळा, जनजागृती मोहीम, चर्चासत्रे आणि ग्रामसभांमधून जनतेशी थेट संवाद साधला जाईल. या अभियानाचे अंतिम उद्दिष्ट आहे – हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंब घडवणे. “हा लढा फक्त महिलांचा नाही, तर आपल्या सर्वांचा आहे,” असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्यातील जनतेला या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.