धनंजय मुंडेंना ‘नॅशनल अवॉर्ड’… गंमत की कटू वास्तव?; अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?

0
93

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे नवे नाहीत, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अलीकडच्या नेमणुका आणि त्यावरील टीका पुन्हा एकदा गाजू लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी दिलेल्या मुलाखतीत सूरज चव्हाण यांची झालेली नेमणूक, अजित पवार यांची भूमिका, तसेच धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या प्रकरणांवर जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे, दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या वर्तनावरून ‘नॅशनल अवॉर्ड’ देण्याची चिमटा काढत टीका केली.


सूरज चव्हाण यांच्या नेमणुकीवर प्रश्नचिन्ह

सूरज चव्हाण यांना नुकतेच युवक अध्यक्षपदाऐवजी पक्षाच्या सरचिटणीसपदी नेमण्यात आले. यावर दमानिया म्हणाल्या –
“२३ दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई केली होती. अजित पवार स्वतः म्हणाले होते की, त्यांचं वर्तन चुकीचं आणि शोभणारं नाही, म्हणून कारवाई करणं गरजेचं आहे. मग आता अचानक त्याच व्यक्तीला जबाबदारीचं पद का दिलं जातंय? अशा गोष्टींमुळे लोकांचा पक्षाच्या नेतृत्वावरचा विश्वास डळमळीत होतो. हे तर एकदम हास्यास्पद आहे. राष्ट्रवादीत बघा, बहुतेक सगळ्यांवर गुन्हे, आरोप, गुंडगिरीचे प्रकरणं आहेत.”

त्यांनी फडणवीसांनी केलेल्या जुन्या आरोपांची आठवणही करून दिली – “सिंचन घोटाळ्याबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले होते चक्की पिसिंग अँड पिसिंग. आता हेच लोक एकत्र आले आहेत, त्यामुळे जनतेत संभ्रम आणि नाराजी आहे.”


छगन भुजबळ प्रकरण पुन्हा चर्चेत

छगन भुजबळ यांच्याविरोधात लढलेल्या लढ्याची आठवण करून दमानिया म्हणाल्या –
“भुजबळ यांनी सात मोठे स्कॅम केले होते, त्यांची सगळी माहिती मी काढून जनतेसमोर आणली. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात त्यांनी कोविड काळात डिस्चार्ज पेटिशन दाखल केली आणि सत्र न्यायालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला. मात्र, मी त्याविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. आज त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेत किती वेळा राजकीय दबाव आणला जातो, हे या प्रकरणातून दिसून येतं.”


धनंजय मुंडेंवर ‘ड्रामा’चा आरोप

धनंजय मुंडे यांच्यावर बोलताना दमानिया यांनी विशेषत: खोचक शब्दांत टीका केली –
“मुंडे म्हणाले होते की, माझं मुंबईत घर नाही म्हणून मी सातपुडा बंगल्यात राहतो, मला गंभीर आजार आहे म्हणून हे गरजेचं आहे. पण प्रत्यक्षात त्यांचं मुंबईत घर आहे, आणि त्यांना असा आजार नाही जो कायमचा आहे. काही आठवड्यांचा त्रास असतो, तोही बरा होतो. हे सगळं खोटं बोलून, सहानुभूती मिळवण्यासाठी मोठा ड्रामा केला गेला. मला वाटतं, अभिनयाच्या बाबतीत तर मुंडे यांना नॅशनल अवॉर्ड मिळायलाच पाहिजे.”


राजकीय वाद अधिक चिघळणार

दमानियांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि नेत्यांच्या नेमणुकीतील दुहेरी मापदंड ऐरणीवर आले आहेत. अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी सत्तेतील निर्णय प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला नवा नाही, पण यावेळी सूरज चव्हाण यांच्या नेमणुकीपासून ते धनंजय मुंडे यांच्या वर्तनापर्यंत अनेक मुद्द्यांवर दमानियांनी घेतलेली आक्रमक भूमिका, राज्याच्या राजकीय वातावरणात नवे वादंग निर्माण करू शकते. आता या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि संबंधित नेते काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here