देवेंद्र फडणवीसांचे सुप्रिया सुळे व रोहित पवारांवर गंभीर आरोप

0
376

माणदेश एक्स्प्रेस/मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेनं आरोप करत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी सदर महिलेला सापळा रचून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास चालू असतानाच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खळबळजनक आरोप केला आहे. आरोपी महिला व तिच्यासोबतचे सहकारी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. यावरून आता राजकीय दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

 

जयकुमार गोरे यांच्यावर झालेले आरोप आणि त्यानंतर संबंधित महिलेला करण्यात आलेली अटक याबाबत देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. “एखाद्याला आयुष्यातून उठवायच्या हेतूने राजकारण होत असेल तर ते योग्य नाही. गोरेंसंदर्भातली केस २०१६ मध्ये नोंद झाली, २०१९ ला संपली. ते तेव्हा सत्तापक्षातही नव्हते. पण त्यानंतर अचानक हे उकरून काढण्याचा प्रकार झाला”, असं फडणवीस म्हणाले.

 

“मी त्यांच्या हिंमतीची दाद देतो. एखादी व्यक्ती अशा स्थितीत गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न करते. पण त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रार केली. त्यानंतर सापळा रचला. सगळं संभाषण रेकॉर्ड झालं. संभाषणाच्या अनेक क्लिप आहेत. पोलीस विभागाची खात्री पटल्यानंतर त्यांनी सापळा रचला. प्रत्यक्ष रोख रक्कम घेताना आरोपीला पकडण्यात आलं. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता”, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

 

“प्रभाकर देशमुख यात थेट १०० वेळा या तिन्ही आरोपींशी बोलले आहेत. व्हिडीओ त्यांच्याकडे गेले आहेत. त्यांचंही उत्तर आलं आहे. पण त्याहीपेक्षा मला वाईट वाटतं ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात यांना झाले आहेत याचं. जयकुमार गोरेंचे जे व्हिडीओ झालेत, ते आरोपींनी या दोघांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होईल. पण हे चाललंय काय? आपण राजकीय शत्रू नाही आहोत, आपण राजकीय विरोधक आहोत. अशा प्रकारे कुणाला जीवनातूनच उठवण्याचा कट रचला जात असेल तर हे चुकीचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here