स्वातंत्र्य दिनी देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; महत्त्वाचे मुद्दे काय?; वाचा सविस्तर

0
370

 माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मुंबई:

आज भारत आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले आणि देशाला संबोधित केले. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ध्वजारोहण केले आणि महत्त्वपूर्ण भाषण दिले.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना तसेच शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली.


‘ऑपरेशन सिंदूर’ला विशेष गौरव

फडणवीस यांनी भाषणात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे विशेष कौतुक केले. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने शिस्तबद्ध पद्धतीने दहशतवादी आणि पाकिस्तानच्या लक्ष्यांना उद्ध्वस्त करून भारताची ताकद जागतिक पातळीवर दाखवली. ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व अधिकारी आणि सैनिकांचे मुख्यमंत्री यांनी अभिनंदन केले.


अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भर भारत

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या वेगाने प्रगतीवर भर दिला. त्यांनी सांगितले की, भारताची अर्थव्यवस्था एका दशकात ११व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

फडणवीस म्हणाले, “स्वदेशी उत्पादनांचा वापर करून आत्मनिर्भर भारत तयार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचा वाटा या प्रगतीत मोठा आहे. देशात येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपैकी ४०% गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. तसेच, वस्तू निर्मिती, निर्यात आणि स्टार्ट-अप्समध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.”

त्यांनी महाराष्ट्राच्या उत्तम शिक्षण व मानव संसाधन विकास क्षमतेवर भर देत म्हटले की, राज्य देशाच्या विकासाचे नेतृत्व करेल.


शेतकऱ्यांसाठी खास घोषणा

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या:

  1. ५ वर्षांसाठी मोफत वीज – राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ५ वर्षांसाठी वीज मोफत दिली जाईल.

  2. मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प – दिवसा १२ तास हरित वीज उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला जाईल. हा प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनेल जिथे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास हरित वीज मिळेल.

  3. नदीजोड प्रकल्प – शेती आणि उद्योगांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.


सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सुरक्षा दलांचे कौतुक केले. गडचिरोली पोलिसांनी माओवादी आणि नक्षलवाद्यांपासून गडचिरोली मुक्त केले, ज्यामुळे गडचिरोली आता स्टील हब म्हणून विकसित होत आहे आणि देशातील सर्वाधिक स्टील उत्पादन येथे होणार आहे.


पायाभूत सुविधा आणि विकास

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात विविध पायाभूत प्रकल्प सुरू आहेत:

  • वाढवण बंदर, पुणे, नागपूर, गडचिरोली, अमरावती येथील विमानतळांचे आधुनिकीकरण

  • समृद्धी महामार्गसारखे मोठे रस्ते प्रकल्प

  • १,००० पेक्षा जास्त गावांमध्ये सिमेंट-काँक्रीटचे रस्ते बांधणी

फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संतांनी दाखवलेल्या वाटेवर महाराष्ट्र चालत राहील. राज्याचा विकास व शेतकरी, उद्योग आणि नागरिक यांचा समृद्धी मार्ग यावर केंद्रित असेल.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here