
माणदेश एक्सप्रेस/कोल्हापूर : सर्वसामान्य रुग्ण आजारी पडला तर त्याला शासकीय योजनांमधून चांगल्या प्रकारचे मोफत उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना व पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना सुरू केली खरी; मात्र या योजनेशी संलग्नित रुग्णालयांची एका वर्षात २५७ कोटी रुपयांची बिले थकल्याने या योजनांचा पांगुळगाडा झाल्याचे चित्र राज्यभरात आहे. सरकार पैसेच देत नसल्याने काही रुग्णालयांनी या योजनेअंतर्गत लाभ देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. कोल्हापुरातील आरटीआय कार्यकर्ते सुनील मोदी यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागवली होती. त्यातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली.
गरिबांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना व पंतप्रधान आयुष्मान भारत योजना सुरू केली. या योजनांशी संलग्नित रुग्णालयांमध्ये पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. या उपचारांचे प्रतिपूर्ती रक्कम सरकारकडून संबंधित रुग्णालयांना दिली जाते. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ दिलेल्या रुग्णालयांची २२० कोटी २४ लाख ६५ हजार ६५५ रुपये इतकी रक्कम थकीत आहे.
हे पैसे मंजूर झाले असले तरी अद्याप ते रुग्णालयांना दिलेले नाहीत. तर पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या रुग्णालयांची ३७ कोटी २९ लाख ९० हजार ६५० रुपये इतकी रक्कम थकली आहे. विशेष म्हणजे महात्मा फुले जनआरोग्य योजनेची २२० काेटी रुपयांची बिले मंजूर आहेत. मात्र, यातील एक पैही रुग्णालयांना मिळालेला नाही.(स्त्रोत-लोकमत)