
तुमच्याकडे रेशनकार्ड असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला ई-केवायसी पूर्ण करावे लागणार आहे. ई-केवायसीची अंतिम तारीख ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी, शेवटची तारीख ३१ मार्च होती. या मुदतीत तुम्ही ई-केवायसीचे काम पूर्ण केलं नाही तर तुमचे नाव रेशन कार्डवरून हटवण्यात येईल. तुम्ही घरबसल्या ई-केवायसी करू शकता.
सरकारने आतापर्यंत ६ वेळा मुदत वाढवली आहे. पण, यावेळी असे म्हटले जात आहे की ही तारीख वाढवण्याची ही शेवटची वेळ आहे. अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून म्हटले आहे की ई-केवायसीचे काम या नवीन तारखेपर्यंत पूर्ण करावे. ई-केवायसी कोणत्याही परिस्थितीत ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावे लागेल. ई-केवायसीसाठी, लाभार्थी पीडीएस दुकानात जाऊन ई-पीओएस मशीनच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे २३.५% रेशनकार्डची पडताळणी अजूनही प्रलंबित आहे. केवायसी म्हणजे Know Your Customer. याद्वारे तुमची ओळख पटवण्यात येते. बनावट रेशनकार्ड असलेल्या लोकांना सिस्टममधून काढून टाकण्यासाठी केवायसी करण्यास सांगितले जात आहे. रेशनकार्ड धारकांना मिळणारे फायदे अनेकजण पात्र नसताना घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही नावे हटवण्यासाठी ही प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.
सर्वप्रथम तुमच्या राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या वेबसाइटवर जा. तिथे ‘e-KYC for Ration Card’ वर क्लिक करा. यानंतर रेशन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक टाका. कुटुंबप्रमुखाचा आधार क्रमांक एंटर करा, त्यानंतर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो भरा, सर्व माहिती एंटर करा आणि सबमिट करा.