
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत दिसणारा कल विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे बदलल्याची प्रतिक्रिया या निकालांवर व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावेही केले गेले. या निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप राज्यातील विरोधी पक्षांकडून अर्थात महाविकास आघाडीकडून करण्यात येत होते. आज लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींबाबत सविस्तर आकडेवारी देऊन तीन महत्त्वाचे प्रश्न निवडणूक आयोगाला केले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली होती, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला मोठा विजय मिळला. दरम्यान हा निवडणूक निकाल आणि निवडणूक प्रक्रिया याबद्दल विरोधकांकडून वेगवेगळे आरोप केले जात आहेत. आज लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहेत. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एक वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. “जेव्हा एकच विनोद पुन्हा पु्न्हा ऐकवला जातो तेव्हा त्यावर हसू येत नाही (जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते!),” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. विशेष म्हणजे फडणवीस यांनी काँग्रेसचे नेत राहुल गांधी यांना टॅग करत केली आहे.