मोठी बातमी! शरद पवारांनी निष्ठावान शिलेदार गमावला, हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन, राजकारणात मोठी पोकळी

0
15

माणदेश एक्सप्रेस न्यूज | जळगाव :
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष राजीव (राजू) देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या केवळ 55 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे केवळ जळगाव जिल्ह्यातच नव्हे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राजीव देशमुख यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने चाळीसगाव आणि जळगाव परिसरात शोककळा पसरली आहे.


राजू देशमुख हे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते. त्यांनी 2009 ते 2014 या कार्यकाळात विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिलं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघात विविध विकासकामं हाती घेतली होती. 2014 च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला, पण त्यानंतरही त्यांनी राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका कायम ठेवली.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळं पाऊल टाकून सत्ता काबीज केल्यानंतर अनेक नेत्यांनी गटबदल केला. परंतु राजीव देशमुख हे शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात. त्यामुळेच त्यांना पक्षाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आणि प्रदेश उपाध्यक्ष पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती.


महाविकास आघाडीच्या वतीने होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चाळीसगाव नगराध्यक्ष पदासाठी राजू देशमुख यांचं नाव चर्चेत होतं. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि जनसंपर्कामुळे स्थानिक पातळीवर त्यांना मोठा आधार होता. मात्र, निवडणूक राजकारणात नव्या भूमिकेत परत येण्याआधीच नियतीने त्यांना हिरावून घेतलं.


राजीव देशमुख यांच्या निधनाची वार्ता समजताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह सर्वपक्षीय नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तसेच वरिष्ठ नेते सुप्रिया सुळे, जयंतीलाल गव्हाणे, आणि स्थानिक नेत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शोकसंवेदना व्यक्त केल्या.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी निर्माण केलेली नेतृत्वाची परंपरा, लोकसंपर्क आणि विनम्र स्वभाव आजही जनतेच्या मनात कोरलेले आहेत.


पक्षातील सहकाऱ्यांनी राजीव देशमुख यांना “जनतेचा नेता” म्हणून ओळख दिली होती. ते सदैव कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध राहणारे, जमिनीशी जोडलेले नेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादीच्या संघटनात्मक कामकाजाला आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसला आहे.


राजीव देशमुख यांच्या निधनाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एक निष्ठावान शिलेदार हरपला आहे. त्यांचं योगदान आणि लोकसंपर्क आजही पक्षासाठी प्रेरणादायी ठरतील.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here