
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी (प्रतिनिधी) : आटपाडी बाजार समितीच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी आयोजित शेतकरी मेळाव्यात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचे सुस्पष्ट व मार्गदर्शक व्याख्यान पार पडले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक व जिल्हा नियोजन समिती सदस्य तानाजीराव पाटील यांनी बाजार समितीच्या कारभाराचा आढावा घेत, भविष्यातील योजना स्पष्ट केल्या. कार्यक्रमाला शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी बोलताना तानाजीराव पाटील म्हणाले, “आटपाडी बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करत आहोत. बाजार समितीच्या कामकाजामुळे आज ही समिती विभागात पहिल्या क्रमांकावर आहे आणि हा तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद क्षण आहे. संचालक मंडळ काटकसरीने कारभार करत आहे; मात्र काही लोक जाणूनबुजून चांगल्या कामावर टीका करत आहेत.”
पाटील पुढे म्हणाले की, “बाजार समितीच्या पंपावरील कर्मचाऱ्यांकडून घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले असून संचालक मंडळाने त्यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू केली आहे. यापूर्वी पंप तोट्यात होता; मात्र संचालक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या पंप नफ्यात आहे. उलाढाल १०० ते १५० कोटींपेक्षा जास्त झाली असून शासन नियमाप्रमाणे कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला काही लोकांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. तरीही बाजार समितीला ‘अ’ वर्गात आणून राज्यात पहिल्या क्रमांकावर पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
या वेळी हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक अडचणींवर मात करण्याचे मार्ग सांगितले. “आगामी दिवसांत काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर काही भागात उष्णतेचा तडाखा जाणवू शकतो. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, योग्य वेळी योग्य सल्ला घ्यावा. हवामानातील बदल, पावसाचा अंदाज, खतांचा योग्य वापर, दुष्काळ कसा ओळखावा, विजापासून संरक्षण कसे करावे याविषयी शेतकऱ्यांना उदाहरणांसह सखोल मार्गदर्शन दिले.”
डख यांनी सांगितले की, बदलत्या हवामानाचा विचार करून पिक पद्धतीत आवश्यक ते बदल करावेत. यामुळे उत्पादनात वाढ होईल आणि शेतकऱ्यांचे नुकसान टळेल.
या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, उपसभापती सुनील सरक, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेंद्र खरात, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयदीप भोसले, रासपचे लक्ष्मण सरगर, शिवसेनेचे साहेबराव पाटील, बाळासाहेब होनराव, विजय देवकर, अमोल मोरे, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव शशिकांत जाधव यांनी केले. प्रस्तावना संचालक भगवान पाटील यांनी सादर केली, तर आभार संचालक राहुल गायकवाड यांनी मानले.