
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप, शिंदे गट व अजित पवार यांच्या महायुतीत जोरदार इनकमिंग सुरू असताना ठाकरे गटाला धक्का बसतो आहे. अशा वातावरणात “राज ठाकरे आहेत, तोपर्यंत ठाकरे ब्रँड कुणीही संपवू शकत नाही”, असा ठाम विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलताना देशपांडे म्हणाले, “ठाकरे बंधूंमध्ये एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, पण अद्याप मनसेकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. जर असा प्रस्ताव आला, तर त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरे यांचाच आहे. आम्ही सकारात्मक असल्याचं फक्त बोलून काही उपयोग नाही, त्यासाठी कृती हवी.”
ते पुढे म्हणाले, “आज केवळ चर्चाच होत आहेत, प्रत्यक्षात कुठेही ठोस पावले उचललेली दिसत नाहीत. त्यामुळे हे सगळं बोलाची कढी आणि बोलाचा भात आहे. जोपर्यंत राज ठाकरे आहेत, तोपर्यंत ‘ठाकरे ब्रँड’ कुणीही संपवू शकणार नाही.”
मतांसाठी स्वाभिमान सोडणाऱ्यांवर टिका
देशपांडे यांनी नाव न घेता प्रताप सरनाईक यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. “मतांच्या लाचारीसाठी कुणीही स्वतःचा स्वाभिमान गमावू नये,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटले.
पुण्यातील हुंडा प्रकरणावर संताप
पुण्यात नुकत्याच घडलेल्या हुंड्यासंदर्भातील घटनेवरही देशपांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “२१व्या शतकात जर अजूनही हुंड्यासाठी अत्याचार होत असतील, तर ही बाब लज्जास्पद आहे. अशा कोणत्याही अन्यायाविरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे. आमच्या भगिनींवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र सैनिक त्यांच्या पाठीशी भाऊ म्हणून उभा राहील,” अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
ठाकरे-ठाकरे एकत्र येणार?
दरम्यान, संजय राऊत यांनीही दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा सुरू असल्याचे सूचित करत, “योग्य वेळी त्याची माहिती दिली जाईल,” असे सांगितले आहे. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेची भूमिका आणि राज ठाकरे यांच्या निर्णयाची वाट संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळ पाहत आहे.