अर्जुनवाडी तलावाने दिला नवसंजीवनीचा श्वास; तलाव पूर्ण क्षमतेने भरला

0
342

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला अर्जुनवाडी तलाव यावर्षी प्रथमच जून महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरला आहे. तालुक्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे तलाव तुडुंब भरून ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे गोमेवाडी गाव ओढ्याला पाणी आले असून, करगणी मार्गे हेच पाणी सांगोला तालुक्यातील बुद्धीहोळ तलावात पोहोचत आहे. यामुळे बुद्धीहोळ तलाव लवकरच भरून निघेल, अशी आशा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 

अर्जुनवाडी तलाव भरल्यामुळे अर्जुनवाडी, गोमेवाडी, करगणी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. तलावातील पाण्यामुळे परिसरातील शेतसंपत्ती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार आहे. पावसाळ्याच्या प्रारंभीच तलाव भरल्याने खरीप हंगामाला चांगला हातभार लागणार आहे.

 

आटपाडी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. टेंभू योजना सुरू होण्यापूर्वी याच अर्जुनवाडी तलावातून टँकरद्वारे तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असे. त्यामुळे हा तलाव त्या काळात तालुक्याला मोठा आधार ठरला होता. आजही हा तलाव ग्रामीण जीवनात महत्वाचे स्थान राखून आहे.

 

तलावातील पाणी सांडव्यावरून वाहत गोमेवाडी ओढ्यातून करगणीमार्गे पुढे जात आहे. हे पाणी बुद्धीहोळ तलावात पोहोचत असल्याने लवकरच बुद्धीहोळ तलाव देखील भरून निघेल, अशी परिस्थिती आहे. संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यंदा जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण तालुक्यात जलसाठ्याची स्थिती समाधानकारक झाली आहे. अनेक छोटे मोठे तलाव, बंधारे भरून वाहू लागले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here