
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|सांगली : अलमट्टी व हिप्परगी धरणातील पाणीसाठा आणि विसर्गावर सतत लक्ष ठेवण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने मोठा निर्णय घेत ३२ अधिकार्यांपची नियुक्ती केली आहे. २९ जूनपासून १५ ऑक्टोबरपर्यंत या अधिकार्यांाची रोज बदलून ड्युटी लावण्यात येणार असून, धरणांच्या वस्तुस्थितीची माहिती वेळोवेळी पूर नियंत्रण कक्षाला देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
सध्या सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अलमट्टी धरणात ७६,७०१ क्युसेकने पाण्याची आवक होत असून, विसर्ग ७०,००० क्युसेकवर गेला आहे. धरण ७६.५९ टीएमसीने भरले असून, एकूण साठा ६२ टक्के झाला आहे. मागील वर्षी २४ जून रोजी केवळ २५ टक्के साठा होता. यंदा जूनमध्येच धरणाचा इतका साठा झाल्याने कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता, अलमट्टी धरणावर १६ आणि हिप्परगी बॅरेजवर १६ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. हे सर्व अधिकारी दररोज बदलून नियुक्त केले जातील. त्यांना दर तासाला धरणातील पाणीसाठा, विसर्ग, उघडलेले दरवाजे इत्यादी माहिती पूर नियंत्रण कक्षाला कळवावी लागणार आहे.
या कामात कसूर झाल्यास संबंधित अधिकार्यां वर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. अधिकारी वेळेत धरणावर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.