बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मागच्या महिन्यात हत्या करण्यात आली. या प्रकरणात आधी तीन आरोपींना आणि नंतर इतर आरोपींना अटक करण्यात आली. तर या प्रकरणाचा संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा ३१ डिसेंबरला पोलिसांना शरण आला. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा माणूस आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून होत होती. दरम्यान धनंजय मुंडे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित झाले आणि त्यांनी याबाबत उत्तर दिलं
.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हा सातत्याने संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हा मुद्दा लावून धरला आहे. तसंच सर्वपक्षीय नेत्यांनी याच प्रकरणात राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांचं विष्णू चाटेचं कनेक्शन काय? तसंच पंकजा मुंडे,धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे लोकसभेला कशा हरल्या हे देखील सांगितलं आहे.
दरम्यान या सगळ्या घटना घडत असताना धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर धनंजय मुंडेंनीच उत्तर दिलं आहे. धनंजय मुंडे म्हणाले, “मी आज कॅबिनेटच्या बैठकीसाठी आलो आहे तसंच मी काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही.”