मित्रपक्षांनाच फडणवीसांकडून धोका?; संजय राऊतांचा गंभीर आरोप

0
38

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :

राज्यातील महायुती सरकारवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ने पुन्हा एकदा तीव्र निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत, “भाजपने आपल्या मित्रपक्षांनाच डावलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे,” असा इशारा दिला. तसेच “भाजपमध्ये सध्या ऑपरेशन ‘फ्रेंडशिप ब्रेक’ सुरू आहे,” असे म्हणत त्यांनी शिंदे आणि अजित पवार यांच्या गटांनाही सावध केले.


राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात सध्या जे बहुमत दाखवलं जातंय, ते खरं बहुमत नाही. हे सर्व कृत्रिम आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांना शिंदे गट आणि अजित पवारांचा गट दोन्ही फोडायचा आहे. त्यासाठी भूमिगत हालचाली सुरू झाल्या आहेत. फडणवीसांना स्वयंभू राज्य करायचं आहे, हे स्पष्ट दिसतंय.”

त्यांनी पुढे सांगितले, “फडणवीसांना दिल्लीकडे पाठवण्याचे शिंदे सांगत असतील, पण भविष्यात दिल्लीच अस्थिर होईल. मी जे फडणवीस यांना ओळखतो, त्यावरून सांगतो की ते शिंदे यांच्या बंदोबस्तासाठी समर्थ आहेत.


राऊतांनी आपल्या शैलीत महायुतीतील मित्रपक्षांना थेट इशारा दिला. “असा कोई सगा नाही, जिसे भाजपने ठगा नाही,” या हिंदी वाक्याचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं – “आज शिंदे, अजित पवार यांच्यासोबत जे घडतंय, ते काही नवीन नाही. भाजपने प्रत्येक मित्राला शेवटी बाजूला टाकलं आहे. आज सत्तेत असलेल्यांनीही या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे.”


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल तापू लागला आहे. महायुतीमध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, अशी चर्चा आहे. मात्र दुसरीकडे भाजपमध्ये “इनकमिंग” सुरू झाल्याने असंतोषाचे वारे उठले आहेत.
सोलापूरमध्ये “ऑपरेशन लोटस” पुन्हा सुरू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मात्र “तिथली आणीबाणीची परिस्थिती आम्ही थोपवली,” असा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर राऊतांनी फडणवीसांना लक्ष्य केलं आणि महायुतीतील अंतर्गत हालचालींचा पर्दाफाश केला.


पत्रकार परिषदेत राऊतांनी काँग्रेसलाही इशारा दिला. “संविधान, लोकशाही आणि मुंबई वाचवण्यासाठी काँग्रेसने स्पष्ट भूमिका घ्यायला हवी. काही स्थानिक नेते वेगळे सूर लावत असतील, तर ते योग्य नाही,” असे त्यांनी सांगितले.
राऊतांनी काँग्रेसला उद्देशून म्हटले – “आम्ही शिवसेना म्हणून आमचा हेतू स्पष्ट केला आहे. पण मुंबई आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट आवश्यक आहे. जर काँग्रेस दोन मनात असेल, तर त्याचा तोटा संपूर्ण महाराष्ट्राला होईल.”


अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी “2029 पर्यंत मीच मुख्यमंत्री असेन” असा दावा केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले –

“एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही गुडघ्यांना बाशिंग बांधून बसले आहेत. पण त्यांच्या स्वप्नांवर फडणवीसांनी पाणी फेरलं आहे.”

ते पुढे म्हणाले, “शिंदे म्हणतात आम्ही फडणवीसांना दिल्लीत पाठवू, पण फडणवीस हे स्वतःचा बालेकिल्ला मजबूत करत आहेत. शिंदेंची वेळ आली की त्यांनाच फोडतील.”


राज्यातील सत्ता समीकरणं पुन्हा हलणार असल्याचे संकेत आता स्पष्ट दिसत आहेत. भाजपमध्ये “इनकमिंग” वाढत असताना शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राऊतांच्या वक्तव्याने या चर्चांना अधिक खतपाणी घातले आहे.

राज्याच्या राजकारणात संजय राऊतांची वक्तव्यं अनेकदा आगामी घडामोडींचं संकेत देतात. त्यामुळे “फडणवीस शिंदे आणि अजित पवारांना फोडण्याच्या तयारीत आहेत का?” हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे.


संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या अंतर्गत ताणतणावाचं चित्र पुढे आलं आहे. फडणवीसांच्या भूमिकेवर आता शिंदे आणि अजित पवार गटाची प्रतिक्रिया काय येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सत्ता समीकरणं स्थिर राहतील की पुन्हा एकदा राजकीय भूकंप होईल — याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here