गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांचा स्पष्ट पलटवार

0
168

माणदेश एक्सप्रेस न्यूज | सांगली :

सांगली जिल्ह्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वादळ माजलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील शाब्दिक चकमक आता तीव्र स्वरूपात दिसून येत आहे. पडळकर यांनी अलीकडेच जयंत पाटील यांच्यावर केलेल्या खालच्या स्तरावरील टीकेमुळे राजकीय वातावरण तापले असून, त्यावर आता स्वतः जयंत पाटील यांनीच ठाम आणि रोखठोक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.


सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात जयंत पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर भाष्य केले. सूत्रसंचालकाने पाटील यांना विचारले की, “तुमच्या ४० वर्षांच्या राजकारणात कुणी एवढ्या खालच्या पातळीवर टीका केली नव्हती. तुमच्या आई-वडिलांवर केलेल्या वक्तव्याबद्दल तुम्ही काही प्रतिक्रिया दिली नाही, याबद्दल तुमचं मत काय?”

यावर जयंत पाटील यांनी शांत पण धारदार शब्दात उत्तर दिलं —

“क्या बड़ा तो सबसे दम बड़ा… मागे मी एकदा सांगितलं होतं, की आपलं नाव ऐकलं नाही असं एकही गाव नाही आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही!”

या एका विधानावरूनच पाटील यांच्या प्रतिक्रियेतली ठामपणा आणि आत्मविश्वास स्पष्ट जाणवला.


पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले,

“जाऊ दे, वेळ येईल. आम्ही वाळवे तालुक्यातले लोक फार हुशार, दमदार आहोत. काळ वेळ बघू. जो आपला आहे त्याला समजावून सांगायचं, पण विरोधक असेल तर दुर्लक्ष करायचं. आणि जो आपला नाही, त्याला सुधरवण्याचा प्रयत्न कशाला करायचा?”

या वक्तव्याने जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेताही त्यांना थेट इशारा दिला असल्याचं स्पष्ट होतं.


गेल्या आठवडाभरापासून दोन्ही आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु आहे. गोपीचंद पडळकर यांनी एका कार्यक्रमात जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली होती. त्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्त्यांत रोष निर्माण झाला होता. यानंतर सांगलीत पाटील समर्थकांनी पडळकरांविरोधात जाहीर सभा घेतली आणि त्यांच्यावर जोरदार टीका केली.

या साऱ्या घडामोडींमुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पाटील-पडळकर यांच्यातील हा वाद आता पक्षपातळीवरच नव्हे, तर व्यक्तिगत पातळीवर गेला असल्याचं बोललं जातंय.


जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर हे दोघेही सांगली जिल्ह्याचे प्रभावी नेते. पाटील राष्ट्रवादीचे मजबूत चेहरा असताना, पडळकर भाजपचा ग्रामीण भागातील प्रभावशाली नेता म्हणून ओळखले जातात. दोघांमधील संघर्ष हा फक्त वैयक्तिक नव्हे, तर राजकीय वर्चस्वाच्या लढाईचं प्रतिबिंब असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
सांगली, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतील ग्रामीण मतदारसंघांमध्ये या वादाचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


जयंत पाटील हे नेहमी आपल्या तडफदार पण संयमी भाषणशैलीसाठी ओळखले जातात. या वेळीही त्यांनी गोपीचंद पडळकरांवर नाव न घेता दिलेला संयमी पण ठाम इशारा हा राजकीय दृष्ट्या मोठा संदेश मानला जात आहे. त्यांच्या वक्तव्याने समर्थकांमध्ये उत्साह आणि विरोधकांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.


“क्या बड़ा तो सबसे दम बड़ा” या वाक्याने जयंत पाटील यांनी केवळ पडळकरांनाच नव्हे, तर संपूर्ण विरोधकांना एकच संदेश दिला आहे —
जयंत पाटील अजूनही सांगलीच्या राजकारणात ‘दम’ दाखवण्यास तयार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here