रणजीत झा (१९) आणि आमिर मलिक (२०) हे मालाड येथील रहिवासी, जे ट्रेकिंगसाठी माहुली गडावर गेले होते, ते रस्ता चुकल्यामुळे गडावर अडकले. दिवस मावळत असल्याने आणि पाऊस सुरू असल्यामुळे त्यांना मदतीसाठी ११२ हेल्पलाईनवर संपर्क साधावा लागला.
हेल्प फाउंडेशनच्या समीर चौधरी यांच्या नेतृत्वाखालील टीमने अन्न, पाणी व टॉर्च घेऊन तीन ते चार तासांची खडतर चढण पार करत अंधारात आणि पावसात धाडसी शोधमोहीम राबवली. या काळात त्यांनी अडकलेल्या तरुणांशी सातत्याने संपर्क साधून त्यांना धीर दिला.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोघांना शोधण्यात यश मिळाले. त्यानंतर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने टॉर्चच्या प्रकाशात दोघांना सुरक्षितपणे माहुली गडावरून खाली उतरवण्यात आले. पहाटेपर्यंत दोघेही सुरक्षितपणे गडाच्या पायथ्याशी पोहोचले.
या धाडसी आणि यशस्वी बचावकार्यामुळे हेल्प फाउंडेशनच्या टीमचे सर्व स्तरांत कौतुक होत असून, तरुणांच्या कुटुंबीयांनीही त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.