उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; राहुल गांधींच्या बैठकीत मागे बसवण्याच्या वादावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण

0
148

नवी दिल्ली | माणदेश एक्सप्रेस न्यूज प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असताना काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी सहकुटुंब भेटले. इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मागच्या रांगेत बसवण्यात आल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. भाजप व शिंदे गटाने यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली, तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या वादावर स्पष्टीकरण देत भाजपवर पलटवार केला.

बैठकीचा संदर्भ

राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन अलीकडील निवडणुकीत घोटाळे झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या वेळी निवडणूक घोटाळ्यावरील प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. बैठकीच्या छायाचित्रांमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत मागे बसलेले दिसले.

सत्ताधाऱ्यांची टीका

शिंदे गट आणि भाजपने उद्धव ठाकरेंवर “स्वाभिमान गमावल्याचा” आरोप करत फोटो शेअर केला. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटले,

“शिवरायांचा वारसा सांगता, पण काँग्रेसच्या मीटिंगमध्ये शेवटच्या रांगेत बसता? बाळासाहेबांनी आत्मसन्मान शिकवला. काँग्रेसने तुमची ही अवस्था करून ठेवली आहे.”

भाजपने देखील सोशल मीडियावर हाच मुद्दा उचलून धरत, उद्धव ठाकरेंनी ‘स्वाभिमान शोधावा’ अशी टीका केली.

संजय राऊतांचे उत्तर

या आरोपांवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले की, उद्धव ठाकरे आधी पुढच्या रांगेत बसले होते. मात्र, स्क्रीनवर सुरू असलेल्या प्रेझेंटेशनकडे नीट पाहता यावे म्हणून ते मागे गेले.

“आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. पुढे स्क्रीनजवळ बसल्यावर त्रास होत होता, म्हणून आम्ही मागे गेलो. ती बसायची जागा नव्हती. भाजपचे फालतू लोक हे समजून घ्यायला हवेत,” असे राऊत म्हणाले.

राऊतांनी हेही सांगितले की, राहुल गांधी व त्यांच्या कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाला भेट घेतली आणि राहुल गांधींचे नवीन घरही दाखवले.

“उद्धव ठाकरे तांत्रिक बाबतीत तज्ज्ञ आहेत. प्रेझेंटेशन व्यवस्थित पाहण्यासाठी ते मागे गेले,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

वादाची पार्श्वभूमी

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचे संबंध २०१९ पासून महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर दृढ झाले आहेत. मात्र, विरोधकांकडून उद्धव ठाकरेंवर “काँग्रेसच्या छायेत राहिल्याचा” आरोप होत असतो. या वादामुळे दिल्ली दौऱ्यातील बैठकीपेक्षा बसण्याच्या जागेवरच राजकीय वादळ उठले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here