एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शहा यांच्याशी ‘गोपनिय बैठक’, निवडणुकांच्या रणनीतीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा!

0
62

माणदेश एक्सप्रेस न्यूज – दिल्ली / मुंबई :
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये हलकल्लोळ निर्माण करणारी एक घटना म्हणजे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची नुकतीच झालेली दिल्ली भेट. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यात सध्या संबंध तणावपूर्ण असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले असताना शिंदे यांची ही भेट अनेक राजकीय संदेश देणारी ठरली. मात्र एकनाथ शिंदे यांनी या भेटीविषयी अधिकृत स्पष्टीकरण देत ती केवळ “सदिच्छा भेट” असल्याचे सांगितले आहे.

शिंदे म्हणाले, “सदिच्छा भेट होती”

“कालच्या (५ ऑगस्ट) एनडीए बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शहा यांचे गृहमंत्री म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष कौतुक केले. त्याच अनुषंगाने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी माझी ही सदिच्छा भेट होती,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

“शिवसेना आणि भाजप यांचं २५ वर्षांहून अधिक काळाचं नातं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपशी जे विचारधारेचं नातं जोडलं होतं, त्याच परंपरेने आम्ही आजही महायुतीमध्ये एकत्र आहोत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?

भेटीदरम्यान फक्त अभिनंदनाचाच नव्हे, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.

“आमच्या महायुतीने लोकसभा निवडणुका जिंकल्या, विधानसभाही जिंकली आणि आता आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकणार, असा विश्वास या बैठकीत देण्यात आला. यासाठी भाजप, शिंदे गट आणि मित्र पक्षांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी काही सूचना दिल्या. संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीची ताकद वाढवण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.

त्याचबरोबर, पक्षातील खासदारांनाही या बैठकीत सहभागी करून घेतल्याने चर्चा केवळ सैद्धांतिक न राहता त्यातून निवडणूक रणनीतीचाही आढावा घेण्यात आल्याचे स्पष्ट होते.

शिंदे-फडणवीस मतभेदाच्या चर्चेला ब्रेक?

गेल्या काही आठवड्यांपासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांना सत्ताधारी वर्तुळात आणि माध्यमांत उधाण आले होते. यामध्येच शिंदे यांची अमित शाह यांच्यासोबत झालेली ही भेट विशेष लक्षवेधी ठरली. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, या भेटीच्या माध्यमातून शिंदे यांनी आपली ‘थेट दिल्लीशी’ नाळ जिवंत असल्याचा सूचक संदेश दिला आहे.

दिल्लीतील दौऱ्याचे राजकीय संकेत

राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, ही भेट केवळ सदिच्छा राहिली नसून, आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी युतीतील ताकद कशी सांभाळायची आणि उमेदवारी वाटपाच्या मुद्द्यावर दिल्ली दरबारी चर्चा होण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटाला स्वतंत्र राजकीय अस्तित्व देताना भाजपशी समन्वय साधणे ही कसरत सोपी नाही. त्यामुळे दिल्ली दौऱ्याच्या माध्यमातून शिंदे यांनी आपली भूमिका बळकट करण्याचा प्रयत्न केल्याचे काहींचे मत आहे.


राजकीय पुढील पावले काय असणार?

एकनाथ शिंदे यांची ही भेट केवळ सौजन्यपर राहिली की त्यातून आगामी निवडणुकांकरिता ठोस रणनिती ठरवण्यात आली हे आगामी काळात स्पष्ट होईल. मात्र शिंदे यांचे दिल्लीतील राजकीय वजन अजूनही कायम असल्याचा स्पष्ट संदेश या दौऱ्यातून गेल्याचे दिसत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here