मुंबईतील कबुतरखान्यांसाठी आता नवीन अटी; मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे तोडगा

0
199

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई

मुंबईतील कबुतरखान्यांच्या बंदीवरून गेले काही दिवस निर्माण झालेला वाद अखेर संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात स्वतः हस्तक्षेप करत “कबुतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही” असा स्पष्ट पवित्रा घेतला असून, नवीन नियमानुसार नियंत्रित खाद्य पुरवठा व स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, आमदार गणेश नाईक, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक महत्त्वाचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि पर्यायी उपाययोजना अमलात आणाव्यात, असे निर्देश देण्यात आले.

 

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की,

“कबुतरखाने बंद करण्याऐवजी वैज्ञानिक अभ्यास आवश्यक आहे. कबुतरांना खाणे घालण्यास विशिष्ट वेळ आणि नियम निश्चित करता येईल. आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने अत्याधुनिक उपाययोजना केल्या जातील.”
त्यांनी नियंत्रित फिडिंग सिस्टम लागू करण्याचा प्रस्ताव मांडला आणि कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून टाटा कंपनीने विकसित केलेल्या विशेष मशीनचा वापर करण्याचेही सूचित केले.

 

न्यायालयात भूमिका ठामपणे मांडणार

या प्रकरणी उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकार कबुतरखान्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना भावनिक आणि धार्मिक संवेदना लक्षात घेणे आवश्यक आहे, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

विशेष समिती आणि उपाययोजना

 

बैठकीनंतर आमदार मंगलप्रभात लोढा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की,
बंद केलेले कबुतरखाने लवकरच पुन्हा सुरू होतील
स्वच्छतेसाठी खास यंत्रणा नेमली जाईल
एक उच्चस्तरीय समिती गठित केली जाईल
प्रत्येक कबुतरखान्यावर “नियंत्रित खाद्य पुरवठा वेळापत्रक” लागू केला जाईल

प्राणीप्रेमी आणि जैन समाजाला दिलासा

या निर्णयामुळे कबुतर व प्राणीप्रेमींमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांत कबुतरखाने बंद करण्यात आल्याने जैन समाज आणि अनेक प्राणीप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here