
माणदेश एक्सप्रेस न्यूज|कोल्हापूर – “राजकारणात मतभेद विसरून एकत्र येणे आणि चांगले काम करणे हे नेहमीच स्वागतार्ह असते. जर आम्ही मतभेद विसरून एकत्र येत असू, तर ते निश्चितच सकारात्मक आहे,” असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी कोल्हापुरात केले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य एकत्रीकरणाला चालना मिळाल्याचे संकेत मिळाले आहेत.
शरद पवार दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्यावर असून, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिल्या. ‘दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का?’ या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी स्पष्टपणे एकत्र येण्याचे संकेत दिले. त्यांनी म्हटले, “मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आली, तरी ते चांगलेच आहे. दोन भाऊ मतभेद विसरून एकत्र आले, तर त्यात वाईट काहीच नाही. पण ते खरोखर एकत्र येतील का, हे सांगायला मी ज्योतिषी नाही.”
राज्यातील जनसुरक्षा कायद्यावर भाष्य करताना पवार म्हणाले की, “या कायद्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे या कायद्यात दुरुस्ती होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आमचा पाठिंबा राहील.”
मराठी शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्तीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्याकडून जाहीर मोर्चाची घोषणा झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “भारतामध्ये सुमारे ५० टक्के लोकसंख्या हिंदी भाषिक आहे, त्यामुळे हिंदीला पूर्णतः दुर्लक्षित करता येणार नाही. मात्र, लहान वर्गांमध्ये हिंदी लादणे योग्य नाही. मोर्चात कोण येतंय आणि कोण नाही, यावर बोलणं टाळायला हवं. भूमिका समजून घेऊन योग्य निर्णय घेतला पाहिजे.”