खरा खवय्या! शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात नेलेल्या पदार्थांची नावं वाचून तोंडाला पाणी सुटेल

0
143

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : भारतीय माणसाचा खवय्या स्वभाव आणि भारतीय अन्नसंस्कृतीचं वैशिष्ट्य आता थेट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलं आहे. स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटमधून अंतराळात गेलेले भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आपल्या मोहिमेत भारतीय खाद्यसंस्कृतीचाही सुवास नेला आहे. आंब्याचा रस, मूग डाळ हलवा, आणि गाजर हलवा हे पारंपरिक पदार्थ त्यांनी अंतराळात नेले आहेत.

 

शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरणार असून, त्यांनी आपल्या सोबत नेलेले अन्न पारंपरिक भारतीय स्वाद आणि विज्ञानाचा संगम आहे. डीआरडीओच्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ बायो-डिफेन्स टेक्नॉलॉजीज या संस्थेने विशेषतः अंतराळातील वातावरणानुसार ही अन्नपदार्थ तयार केले आहेत. कोणताही प्रिझर्व्हेटिव्ह नसलेले, १०० ग्रॅमच्या पॅकेट्समध्ये हे अन्न वर्षभर सहज टिकते.

 

“अंतराळात आमटी-भात नाही, पण चव मात्र देशाची!”
शुक्ला यांच्यासाठी तयार केलेल्या अन्न यादीत मूळतः आमटी-भात देखील होता, मात्र त्यांच्याकडून आंब्याचा रस, मूग डाळ हलवा आणि गाजर हलवा हे तीन पदार्थ निवडले गेले. या पदार्थांनी भारताचा सांस्कृतिक वारसा आंतराळात पोहोचवला आहे.

 

आईचा अभिमान, पण भावनाही
शुभांशू शुक्ला लखनऊचे रहिवासी असून ‘शक्स’ या कॉलसाइनने ओळखले जातात. त्यांच्या आईने सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून त्याने घरचं जेवण खाणं बंद केलं आहे. आता त्याला अंतराळवीरांसाठी ठरवलेले अन्नच खावं लागतं. मात्र, जेव्हा तो वर्षातून एकदा घरी येतो, तेव्हा आमच्यासाठी वेळ काढतो आणि आम्हाला फिरायला घेऊन जातो.”

 

गगनयानसाठीही भारतीय अन्न तयार
या अन्न प्रकारांचा समावेश भविष्यातील गगनयान मोहिमेत देखील केला जाणार आहे. त्यामुळे ही चव केवळ शुभांशू शुक्लांच्यापुरती मर्यादित न राहता, भविष्यातील भारतीय अंतराळवीरांपर्यंत पोहोचणार आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here