कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा– राज ठाकरे यांचा इशारा; “या” तारखेला ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता

0
148

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई: राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राजकीय वातावरण तापले असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ जुलै रोजी भव्य मोर्चाची घोषणा केली आहे. “या आंदोलनात कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, केवळ मराठीचा अजेंडा असेल”, असे सांगत त्यांनी सर्व पक्षीय नेते, साहित्यिक, कलाकार, आणि सामान्य मराठी नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

 

या पार्श्वभूमीवर सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते म्हणजे ठाकरे बंधू — राज आणि उद्धव — हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येण्याची शक्यता. पत्रकार परिषदेत यासंदर्भात विचारले असता, राज ठाकरे म्हणाले, “कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे लक्षात ठेवा. हे वाक्य तुम्हाला ६ तारखेला कळेल.”

 

हिंदी सक्तीविरोधात स्पष्ट भूमिका
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यात पाचवीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्यात येत असल्याचा विरोध करत, “त्रिभाषा सूत्र राज्यावर लादू नये, आणि राज्य सरकार हिंदी भाषा का पुढे आणते आहे हे समजत नाही,” असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यांनी स्पष्ट सांगितले की, “हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही. हिंदी शिकली नाही तरी ती येते; पण सक्ती मान्य नाही.”

 

उद्धव ठाकरेंचाही ठाम विरोध
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया देताना, “हिंदी भाषेचा द्वेष नाही, पण हिंदी सक्तीमागे छुपा अजेंडा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार काय आहेत, हे गद्दारांना समजायला हवे,” असा इशारा दिला. “शिवसेना या आंदोलनामागे खंबीरपणे उभी राहणार,” असे ते म्हणाले.

 

सामूहिक ताकदीचा निर्धार
राज ठाकरे यांनी सांगितले की, हा मोर्चा रविवारी (६ जुलै) आयोजित करण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थी, पालक, आणि सर्वसामान्य नागरिक सहजपणे सहभागी होऊ शकतील. “महाराष्ट्राची एकजूट सरकारला दाखवून देणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here