“देशात पुन्हा सावध राहण्याचा काळ”; शरद पवार यांचे अघोषित आणीबाणीवर गंभीर वक्तव्य

0
171

माणदेश एक्सप्रेस न्यूज|नवी दिल्ली : देशात आणीबाणी जाहीर होऊन आज ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजपकडून काँग्रेसवर टीका करण्यात येत असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील अघोषित आणीबाणीवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

 

शरद पवार म्हणाले, “घोषित आणि अघोषित आणीबाणी यात फरक करण्याची वेळ आली आहे. पुन्हा एकदा देशात सावध राहण्याची गरज आहे. लोकशाही टिकवण्यासाठी वाट्टेल ती किंमत द्यावी लागली, तरी ती देण्याची तयारी ठेवावी लागेल.”

 

प्रेस स्वातंत्र्यावर दबावाचा आरोप
पवार पुढे म्हणाले की, “जे पत्रकार स्पष्ट भूमिका घेतात, ते सरकारच्या विरोधात ठरतात. अशा पत्रकारांना थेट सरकारच्या मुख्यालयातून फोन जातात आणि बातमी छापू नका, अन्यथा परिणामांना तयार राहा, असे सांगितले जाते. ही एक प्रकारची धमकीच आहे.”

 

इंदिरा गांधींचा दाखला देत भाजपवर निशाणा
शरद पवार यांनी १९७५ साली इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीचा दाखला देताना सांगितले, “हो, इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती, पण पराभव झाल्यावर त्यांनी देशाची क्षमा मागितली होती. आणि नंतर जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली होती. ही लोकशाहीचीच ताकद आहे.”

 

राजकीय वातावरण तापले
२५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती, ज्यामुळे देशभरात १८ महिन्यांचा लोकशाहीविरोधी काळ ओढवला. याला भाजपने ‘संविधानाची हत्या’ म्हणत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. दुसरीकडे काँग्रेसने मागील दहा वर्षांपासून देशात ‘अघोषित आणीबाणी’ असल्याचा आरोप केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here