शक्तीपीठ महामार्गात १० हजार कोटींचा घोटाळा? – संजय राऊतांचा गंभीर आरोप

0
97

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई : शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला नुकतीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली असून या प्रकल्पासाठी सुमारे २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा महामार्ग साडेतीन शक्तीपीठ, दोन ज्योतिर्लिंग, पंढरपूर व आंबेजोगाईसह तब्बल १८ तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. यासाठी १२ जिल्ह्यांतील सुमारे २७,५०० एकर जमिनीचे हस्तांतरण होणार आहे.

 

या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी या प्रकल्पावर गंभीर आरोप केले आहेत. “महाराष्ट्राची लूट सुरु आहे,” असे म्हणत त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “या शक्तीपीठ महामार्गासाठी मंजूर झालेल्या १० हजार कोटींपैकी बहुतांश रक्कम ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.”

 

राऊत पुढे म्हणाले, “सध्या राज्यात प्रचंड घोटाळे सुरु आहेत. समृद्धी महामार्गाचा उद्गाटन सोहळा १९ दिवसांपूर्वी पार पडला. मात्र आज इगतपुरी ते आमनेदरम्यान खड्ड्यांचं साम्राज्य आहे. ड्रीम प्रोजेक्टच्या नावाखाली ५० टक्के निधीचा अपव्यय केला जात आहे. हा पैसा मतदार, आमदार, खासदार विकत घेण्यासाठी व ठेकेदारांमार्फत ब्लॅक मनीच्या रूपात वापरला जातो.”

 

“MMRDA चेही ३ हजार कोटी निवडणुकांसाठी वापरले गेले. आता शक्तीपीठ महामार्गाच्याही निधीचा तसाच वापर होणार आहे. हे सगळे प्रकल्प म्हणजे फक्त ठेकेदारांकडून कमिशन काढण्याचे साधन झाले आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

 

राऊतांनी यावेळी समृद्धी महामार्गाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “फक्त ठेकेदारांना दोष देऊन चालणार नाही, या प्रकल्पांशी संबंधित मंत्र्यांनाही तात्काळ मंत्रिमंडळातून काढले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here