देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका

0
100

माणदेश एक्सप्रेस न्यूज|जळगाव : “बोलबच्चन भैरवी असलेल्यांना मी उत्तर देत नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली. जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा घणाघात केला. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या पक्ष मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपला जोरदार इशारा दिला होता.

 

 

“शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसण्याचा प्रयत्न केला, तर भाजपचे नामोनिशाण महाराष्ट्रातून मिटवू,” असे ठाकरेंनी जाहीर सांगितले होते. तसेच “हिम्मत असेल तर अंगावर या, पण अॅम्बुलन्स घेऊनच या, कारण परत जाता येणार नाही,” असे सडेतोड शब्दांत आव्हानही दिले होते. या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “अशा प्रकारची वक्तव्यं करणाऱ्यांना मी बोलबच्चन भैरवी म्हणतो. अशा भैरवींना उत्तर द्यायचं नसतं.”

 

 

ते धरणगाव येथे क्रांतिवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे उद्घाटन आणि ग्रामीण रुग्णालयाच्या भूमिपूजनासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आदिवासी समाजाच्या योगदानाचेही कौतुक केले. “भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाने मोठे योगदान दिले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने अशा स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत,” असे फडणवीस म्हणाले. राजकीय वातावरण तापत असताना दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक चकमक राज्यातील आगामी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर लक्षवेधी ठरत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here