संजय राऊतांना चंद्रकांत पाटील यांचा मिश्कील टोला

0
125

माणदेश एक्सप्रेस न्यूज|सांगली – संजय राऊत यांना प्रत्येक गोष्टीत पिवळे दिसते. कावीळ झाल्यावर सर्व काही पिवळेच दिसते, तशीच त्यांची स्थिती झाली आहे. मात्र, या “कावीळीसाठी” लवकरच योग्य औषध मिळेल, असा मिश्कील टोला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

 

भाजप सांगली शहरतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ११ वर्षांतील उल्लेखनीय विकासकामांवर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सांगलीतील मारुती चौक येथे पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, “संजय राऊत यांना प्रत्येक गोष्टीत छिद्र दिसते. त्यांची नजरच आता ‘पिवळी’ झाली आहे. त्यांना काय झाले आहे, हे मलाही माहीत आहे, आणि त्यावर उपायही माहीत आहे. त्यामुळे लवकरच ते बरे होतील अशी अपेक्षा आहे.”

 

पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाचा आढावा घेत सांगितले की, “मोदी तब्बल १५ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि मागील ११ वर्षांपासून देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. अशा प्रकारे २६ वर्षे उच्चपदावर काम करणारा नेता संपूर्ण जगात विरळाच. या काळात त्यांनी २५ कोटी नागरिकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणले, घर, गॅस, नळपाणी यांसारख्या सुविधा दिल्या. झोपडपट्टीतील व्यक्तींपासून ते अंबानींपर्यंत असा एकही घटक नाही ज्यांना मोदी सरकारच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही.”

 

याचवेळी राज ठाकरे यांच्या संदर्भात बोलताना पाटील म्हणाले, “राज ठाकरे हे वादळी व्यक्तिमत्त्व आहेत. वादळाचा अंदाज लागत नाही, तसेच त्यांच्याही कृतींचा अंदाज बांधणे कठीण आहे. मात्र लवकरच वादळ कोणत्या दिशेने जाणार आहे, ते समजेल.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here