
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : माणदेशातील साहित्यिक व सामाजिक चळवळीत झपाटून कार्य करणारे स्व. प्रा. विश्वनाथ जाधव सर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारा ‘विश्वम’ हा गौरव ग्रंथ आणि ‘मुलुख माणदेश – झपाटलेली माणसे’ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मंगळवार दि. ०३ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता, कल्लेश्वर हॉल, मेनरोड, आटपाडी येथे संपन्न होणार आहे.
इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक तथा मराठी साहित्य विश्वात दर्जेदार साहित्य निर्माण करणारे व्यक्तीमत्व म्हणून प्रा. जाधव यांची ओळख आहे. माणदेशातील अनेक दुर्लक्षीत व्यक्तीमत्त्वांवर प्रकाश टाकत त्यांनी विविध पुस्तके लिहिली. प्रा. जाधव यांचे गतवर्षी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने त्यांनी हाती घेतलेले मुलुख माणदेश आणि झपाटलेली माणसे ही दोन पुस्तके प्रकाशित झाली नाहीत. परंतु लेखकाच्या अपूर्ण स्वप्नांना पुर्ण करण्याचे काम त्यांचे कुटुंबिय व मित्र परिवार, सहकाऱ्यांनी केले आहे. शिवाय प्रा. जाधव यांच्या व्यक्तीमत्त्वावर प्रकाश टाकणाऱ्या ‘विश्वम या पुस्तकाचीही निर्मिती झाली आहे.
सदरचा कार्यक्रम हा जि.प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, क्रांती स्मृतीवनाचे जनक संपतराव पवार, कृष्णा इंगोले, सुभाष कवडे, सयाजीराजे मोकाशी, अरूण शिंदे, इंद्रजित घुले यांच्या उपस्थितीत होणार आहे.कार्यक्रमास जे. आर. चव्हाण, सुधाकर इनामदार, साहेबराव चवरे, डॉ.एम.वाय. पाटील, डॉ. विनय पत्की, प्रदीप पाटील, दिनेश देशमुख, निर्मलकुमार जुगदर, जयसिंग देशमुख, मेघाताई पाटील, अरूणा चव्हाण, शिवाजी बंडगर, पुष्पाताई मिसाळ, संभाजी गायकवाड यांच्यासह आटपाडीसह माणदेशातील साहित्यिक सहभागी होणार आहेत. साहित्यप्रेमीनी पुस्तक व गौरवग्रंथ प्रकाशन सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. चंद्रसेन जाधव, अॅड. चेतन जाधव, संग्राम जाधव व महाराष्ट्र साहित्य परिषद आटपाडी शाखा व शब्द शिवार प्रकाशन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.