राजेवाडी तलावातील वाहणारे पाणी शेतीसाठी सोडा : शहाजीबापू पाटील

0
168

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला/प्रतिनिधी : सध्या राज्यात मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट होऊन उन्हाळ्याची तीव्रता कमी झाली आहे. माण खोऱ्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे माण नदीला भरपूर पाणी आले असून, त्याचा परिणाम म्हणून राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. यामुळे आता तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे.

 

हे वाहणारे पाणी विनाकारण न वाहता थेट सांगोला तालुक्यातील कॅनॉल, तलाव, बंधारे, ओढे आणि नाले यामध्ये वळवून साठवावे, जेणेकरून याचा भविष्यातील खरीप हंगामातील पिकांसाठी उपयोग करता येईल, अशी ठाम मागणी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.

 

सध्या समाधानकारक पाऊस झालेला असला तरी पुढील काळात पावसात खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या प्रमाणात पाणी सध्या उपलब्ध आहे, त्याचा योग्य नियोजनानुसार शेतीसाठी उपयोग व्हावा,” असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. हे पाणी वाया जाऊ न देता सांगोला तालुक्यातील विविध जलसाठ्यांमध्ये साठवून भविष्यातील पाणीटंचाई टाळण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

 

या पाण्याचा वापर करून तालुक्यातील शेतकरी खरीप पेरणीसाठी आणि पीक वाढीसाठी आवश्यक पाणी साठवू शकतील. त्यामुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी मागणीही शहाजीबापूंनी केली आहे.

 

सध्या माण नदीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. याचाही योग्य उपयोग करून सांगोला तालुक्यातील इतर गावांतील तलाव, कॅनॉल, नाले, ओढे भरावेत, जेणेकरून संपूर्ण तालुक्यातील जलसाठे मजबूत होतील व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here